झडशीच्या सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसह निराधारांना सोडले वाऱ्यावर ; भाजयुमोची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
सचिन धानकुटे
सेलू : – झडशीच्या सेन्ट्रल बँकेत जबाबदार असा अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांसह निराधार योजनेतील लाभार्थ्यांची अक्षरशः फरफट होत आहे. त्यामुळे सदर बँकेच्या अनागोंदी कारभारावर अंकुश लावण्यात यावा अशी मागणी आज भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव गौरव तळवेकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी झाला. झडशी येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अद्याप चकराच माराव्या लागत आहे. पीककर्जाची बरीच प्रकरणं येथे अजूनही प्रलंबीत आहेत. जिल्हा उद्योग केंद्राकडून येणारे प्रकरणे देखील प्रलंबित आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारा किसान सन्मान निधी, पंतप्रधान किसान मदत निधीतील रक्कम कर्ज खात्यात वळती करण्यासाठी बँकेकडून बळजबरी केली जात असल्याने ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे. यासोबतच संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी निराधार योजनेतील वृद्ध, विधवा, दिव्यांग निराधारांना मिळणाऱ्या मदतीची रक्कम देण्यासाठीही बँकेकडून नाहक त्रास दिला जातो.
येथील बँक व्यवस्थापक गेल्या महिनाभरापासून रजेवर गेल्याने महत्वाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूणच सेन्ट्रल बँक ऑफ इंडियातील अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवारला भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वात एकत्र येऊन तहसीलदार स्वपनिल सोनवणे यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली.
यावेळी भाजयुमोचे तालुका अध्यक्ष संकेत बारई, जिल्हा उपाध्यक्ष विकास मोटमवार, संजय गांधी निराधार समिती सदस्य राजू झाडे, सरपंच रोशन दुधकोहळे, शुभम मरसकोल्हे, गजानन चाफले, चंद्रशेखर परतेकी, अनंता परतेकी, देवेंद्र घोंगडे, प्रकाश शेळके यांच्यासह शेतकरी व खातेदार मोठ्या संख्येने उपास्थित होते.