नालवाडीत खून : वाढदिवसाच्या पार्टीत दारुविक्रेत्यांचा वाद गेला विकोपाला

किशोर कारंजेकर
वर्धा : – जुन्या वादातून वाढदिवसाच्या पार्टीत वाद विकोपाला गेल्यानंतर रस्त्यात अडवत तलवारीने वार करीत हत्तेचा थरार नालवाडीतील पेट्राेलपंपासमोर घडला. आरोपीच्या शोधात पथक रवाना झाले असून वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करीत असतानाच जुन्या वादातून झालेलेल्या शाब्दीक वादाचा अंत अखेर जिवावर बेतला. वर्धा ते नागपूर रस्त्यावर नालवाडी परिसरातील पेट्राेलपंपासमोर कार आडवी करीत दारुविक्रेत्याने एका तरुणावर तलवारीने सपासप वार करुन त्याची निर्घूण हत्या केली. ही घटना मध्यरात्री १.३० ते २ वाजताच्या दरम्यान घडली.
राहुल विरुळकर (३२) रा. संत ज्ञानेश्वर नगर म्हसाळा, असे मृतकाचे नाव आहे. तर दिनेश अशोक येंडाळे रा. नालवाडी आणि चिंटू शर्मा रा. शास्त्री चौक अशी आरोपींची नावे आहे.
इम्रान नामक तरुणाचा वाढदिवस असल्याने त्याने केळझर जवळील हायवे लगतच्या एका धाब्यावर ‘सेलिब्रेशन’ ठेवले होते. त्या पार्टित आरोपी दिनेश येंडाळे, चिंटू शर्मा आणि मृतक राहुल विरुळकर हे देखील सहभागी झाले होते. आरोपी दिनेश आणि मृतक राहुल यांच्यात जूना वाद होता. पार्टीत पुन्हा दोघांत शाब्दीक वाद झाला. राहुल पार्टीतून निघून त्याच्या मित्रांसह कारने वर्धा येथे येत होता. दरम्यान तेवढ्यातच मागाहून दिनेश येंडाळे आणि चिंटू शर्मा हे कारने भरधाव आले आणि ओव्हरटेक करुन कार थेट राहुलच्या कारसमोर आडवी लावली. दिनेश तलवार घेत कारबाहेर निघाला आणि शिवीगाळ करु लागला. राहुल कारखाली उतरला असता दिनेश व चिंटूने राहुलला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तलवारीने सपासप वार करीत त्याची निर्घृण हत्या केली. रक्तबंबाळ अवस्थेत पडून असलेल्या राहुलला त्याच्या मित्रांनी लगेच सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉकटरांनी त्यास मृत घोषित केले. राहूलची पत्नी स्मिता हिने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दिनेश येंडाळे व चिंटू शर्मा याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.