सेलूच्या पुरवठा विभागाला दिव्यांगाची अँलर्जी..! इष्टांकाच्या गोंडस नावाखाली लाभार्थ्यांची होतेय ससेहोलपट : प्रहारचा शिधापत्रिका तोंड पाहून वितरित केल्या जात असल्याचा आरोप
सचिन धानकुटे
सेलू : – येथील पुरवठा विभागात शिधापत्रिका या तोंड पाहून वितरीत केल्या जात असल्याने पुरवठा विभागाला दिव्यांगाची अँलर्जी तर नाही ना..! असा सवाल प्रहार अंपग क्रांती संघटनेच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकेसाठी येथे इष्टांकाच्या गोंडस नावाखाली वेठीस धरले जात आहे, तर दुसरीकडे काही निवडक लाभार्थ्यांनाच अंत्योदय कार्डचे वितरण करण्यात आले. त्यामुळे येथे दिव्यांगाना दिली जाणारी सापत्न वागणूक अधोरेखित झाली आहे.
शासनाकडून दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंत्योदय शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जातात. दिव्यांगासाठी काम करणाऱ्या प्रहार अपंग क्रांती संघटनेने यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा देखील केला. यासाठी जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु त्यावेळी स्थानिक पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इष्टांक प्राप्त झाल्यास लवकरच दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिका देण्यात येईल असे पोकळ आश्वासन दिले आणि तुर्तास वेळ मारुन नेली. दरम्यान तालुक्यातील काही निवडक लाभार्थ्यांना मात्र इष्टांक गेला धोड्यात..! त्यांना थेट शिधापत्रिकाच देण्यात आल्यात. त्यामुळे येथील पुरवठा विभागाचा सवतासुभा प्रामुख्याने चव्हाट्यावर आला. येथील पुरवठा विभागाची दिव्यांगाच्या प्रती असलेली उदासिनता यानिमित्ताने चांगलीच अधोरेखित झाली आहे.
येथे अंध, अस्थिव्यंग आणि मतिमंद असलेल्या तालुक्यातील अठरा लाभार्थ्यांना अद्याप अंत्योदय शिधापत्रिका देण्यात आल्या नाहीत. याउलट सेलू, सिंदी व आमगांव येथील तीन लाभार्थ्यांना मात्र हेतुपुरस्सर अंत्योदय शिधापत्रिका देण्यात आल्यात. याकरिता पुरवठा विभागास इष्टांक कसा काय मिळाला, हाच खरा कळीचा मुद्दा ठरला आहे. याकडे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल मिश्रा यांनी नुकतीच निवेदनाद्वारे केली.