Breaking
ब्रेकिंग

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीबाबत सस्पेंन्सच : एकापेक्षा एक सरस नावांची भाजपत चर्चा : रामदास तडस यांना उमेदवारी नाकारली जाणार? : उमेद”वारी”त कोणाची ठरणार उमेद “भारी”

1 9 7 0 1 5

किशोर कारंजेकर

वर्धा : चित्रपटात ‘सस्पेन्स’ जर नसेल तर तो ‘फ्लॉप’ होतोच. तसे राजकारणातही आहे. तब्बल पावणे दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होण्याचा बहुमान मिळवून दोनदा खासदार झालेले रामदास तडस आता सत्तरी पार झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात ते आता षड्डू ठोकणार नाही, याची निश्चिती भाजप गोटातच झाली आहे. अशात वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याचाही तेवढाच सस्पेन्स कायम आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचे नाव वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकरीता पुढे आल्याने या नावाच्या सस्पेन्सला नवीन फोडणी बसली आहे. पण आता त्यातले पुढेच पाऊल पडत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरू झाल्याने विद्यमान खासदार तडस यांना खासदारकी जाण्याच्या धास्तीने घाम फुटायला लागला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीतला ‘सस्पेन्स’ संपण्याऐवजी कमळाच्या पाकळ्यात अडकलेल्या भुंग्यासारखी व्हायला लागली आहे. उमेदवारीच्या नावाच्या निमित्ताने राजकीय चिखलात भाजप कोणाचे कमळ फुलविते, याची उत्सुकता लागली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्णय ‘संघा’कडून झाल्याने देवेंद्र फडणवीस नागपुरातून लढतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे स्नेही नितिन गडकरी वर्ध्यातून निवडणूक लढतील, अशा चर्चा व्हायला लागल्या आहेत.

ऐकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वर्धा लोकसभा मतदार संघ आता भाजपकरीता विजय मुडे यांच्या उमेदवारीनंतर ‘सेफ’ झोनमध्ये आला आहे. नितीन गडकरी यांनीच वर्धा लोकसभा मतदार संघाचे नाव पुढे केल्याने तेच आता लढणार आहे. यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसल्याने वर्धा उमेदवारीचे सस्पेन्स कायम आहे.

विद्यमान खासदार रामदास तडस हे महाराष्ट्र तैलिक महासंघ आणि महाराष्ट्र कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष आहेत. अशात तडस यांची नाराजीही विचारात घेतली जाणार आहे. चंद्रपूरचे हंसराज अहिर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष करून भाजपने त्यांचे पुनर्वसन केले होते. त्याच पद्धतीने खासदार रामदास तडस यांचे ‘आयोगा’च्या खुर्चीत बसवून पुनर्वसन केले जाणार असल्याचे नियोजन केल्याचे बोलले जात आहे.

येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. साधारणत: एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या रिंगणात हजारो उमेदवार उतरतात. त्यात विविध राजकीय पक्षांशिवाय अपक्ष उमेदवारांचीही संख्या मोठी असते. यावेळी किती उमेदवार लोकसभा निवडणुकीत उमेदीने उतरणार, कोण नाउमेद होणार, कोणाची उमेदवारी भारी ठरणार, याची सूत्रे मतदारांच्या हाती आहेत. तोपर्यंत अंदाज अपने अपने, खयाल अपने अपने, असेच राहणार.

3.5/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे