टँकरच्या धडकेत मायलेकीचा जागीच मृत्यू ; लग्न सोहळ्याला जाताना घडली दुर्दैवी घटना

सचिन धानकुटे
वर्धा : – टँकरने दुचाकीला मागाहून दिलेल्या धडकेत मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलगांव मार्गावरील बाजारवाडा बसस्थानकाजवळ आज शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी टँकरसह त्याच्या चालकास ताब्यात घेतले.
विरुळ आकाजी येथील राजकुमार नामदेवराव सयाम(वय२९) हे आपल्या एमएच ४० एजे ३६४६ क्रमांकाच्या बजाज डिस्कव्हरने पत्नी निलीमा(वय२७) आणि तनुष्का व रियांशी नामक दिड वर्षीय जुळ्या मुलीं समवेत नेरपिंगळाई येथे लग्न सोहळ्यासाठी जात होते. यावेळी रियांशी ही समोर तर तनुष्का ही आपल्या आईजवळ बसून प्रवास करीत होते. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चौघेही विरुळ येथून पुलगांव-आर्वी असा प्रवास करत असताना बाजारवाडा बसस्थानकाजवळ त्यांच्या मागाहून जीजे १६ एडब्ल्यू २४४५ क्रमांकाचा टँकर भरधाव वेगात आला. त्यामुळे दुचाकीचा तोल गेला आणि पत्नी निलीमा व मुलगी तनुष्का या दोघी गाडीवरून खाली पडल्यात आणि टँकरच्या खाली चिरडल्या गेल्यात. तर राजकुमार आणि रियांशी हे दोघे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडल्याने थोडक्यात बचावले. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी सदर टँकरसह त्याच्या चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.