Breaking
ब्रेकिंग

मतदारांच्या मनकौलातला नाराजीचा सूर कोणाला भोवणार ?

1 9 7 0 8 2

वर्धा लोकसभा रणधुमाळी 

           लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेत. भाजपने तिसर्‍यांदा विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी देत त्यांना त्यांची लोकप्रियता जोखून पाहण्याची जोखीम पत्करली. त्याचवेळी राज्यातील महाविकास आघाडीकडून पहिल्यांदाच वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याकडे जात त्यांच्यावतीने माजी आमदार अमर काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. याबाबतच्या घोषणेची केवळ औपचारिकताच शिल्लक आहे.

रामदास तडस हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच. ते भाजपत गेले. त्यावेळी शरद पवार यांनी कोठलेही मतप्रदर्शन केले नव्हते. पण त्याचे उट्टे काढण्याचेच हे नियोजन आहे काय, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.

रामदास तडस यांना अ‍ॅन्टि इंकम्बन्सीचा फटका बसेल काय, याची चर्चा आहे. मतदारांत सिलिंडर, पेट्रोलची भाववाढ, शेतमालाला नसलेला भाव, त्याबाबत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाला भाजप सरकारने लावलेल्या वाटाण्याच्या अक्षदा, याची एकगठ्ठा नाराजी आहे. त्यातच भाजपमध्येही सगळे आलबेल नाही. माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मूळ गावातच त्यांच्या विरोधी मतदानाला कोणी खतपाणी घातले होते. देवळीत राजू बकाणे यांच्यासोबत कोणाचे टोकाचे मतभेद आहेत, त्यांनी जे सहन केले, त्याबाबतची नाराजी यावेळी व्यक्त होणारच नाही, याची ग्वाही कोणी देत नाही.

विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांची पाटी कोरी आहे. त्यांच्याबाबत जिल्ह्यात नाराजी असण्याचे कारण सध्या तरी दिसत नाही. पण त्यांनी लोकसंपर्काच्या कक्षा वाढविणे गरजेचे आहे. मतदारांना गृहीत धरून काहीही होणार नसते. मतदार फार आश्वासनांना भुलतील यावर विश्वास कमी व्हायला लागला आहे. त्यांच्या संकटात साथ देणार्‍याला साथ देण्यात मतदार मागे पाहात नाही, हा आजवरचा अनुभव आहे.

अमर काळे यांनी सगळ्यांचे कॉल स्वीकारले पाहिजे. उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे रवी बालपांडे यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला बाजूला ठेवून चालणार नाही. काँग्रेसमधील गटबाजीचा तर त्यांनाच अनुभव आहे. ठराविक कोंडाळ्याच्या बाहेर पडून त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल.

सामना चुरशीचाच होणार, यातून जिल्ह्यात नवीन नेतृत्त्वाचा उदय होण्याची संधी आहे. मतदारांचा मतकौल पाच वर्षांनी कां होईना सामना फिरविण्याची क्षमता ठेवतो.. तूर्तास येवढेच.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे