रोजगार मेळाव्यातून १६१४ बेरोजगारांच्या हाताला मिळाले काम ; वर्ध्यासह सेलूच्या साहसिक जनशक्ती संघटनेच्या रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद
पुण्याच्या २२ नामांकित कंपन्यासाठी १ हजार ६१४ जणांची निवड
किशोर कारंजेकर
वर्धा : – जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला त्यांच्या योग्यतेनुसार काम मिळावे, याकरिता साहसिक जनशक्ती संघटना तसेच मित्र परिवाराच्या वतीने वर्ध्यासह सेलू शहरात दोन दिवस भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या मेळाव्यात पुणे येथील २२ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात जिल्ह्यातील १ हजार ९९९ बेरोजगार युवक आणि युवतींनी नोंद करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मुलाखत दिली. यामध्ये १ हजार ६१४ युवक आणि युवतींची निवड करण्यात आली असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक साहसिक व साहसिक न्युज-२४ चे मुख्य संपादक रवींद्र कोटंबकार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला होता. याकरिता साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवाराच्या सहकार्याने काल सोमवारी सेलूच्या यशवंत महाविद्यालय तसेच यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात तर आज मंगळवारी वर्ध्याच्या अनेकांत स्वाध्याय मंदिरात दोन दिवस भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात पुण्याच्या नामांकित अशा २२ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ज्यामध्ये टाटा ऑटोकॉम्प प्रा. लिमिटेड, युएनओ मिंडा(सूपा) प्रा. लिमिटेड, ब्रिटानीया फुडस् प्रा. लिमिटेड, एर्लिंग किंगर, ग्रोअप टेक्नॉलॉजी, एसपीएम प्रा. लिमिटेड, एक्साईड बॅटरी प्रा. लिमिटेड, सूपोद प्रा. लिमिटेड, ग्रुपो अँटोलीन प्रा. लिमिटेड, फ्लॅश ईलेक्ट्रानिक्स प्रा. लिमिटेड, निब प्रा. लिमिटेड, गेडीया प्रा. लिमिटेड, ऑप्टिव कंपोनेंट्स प्रा. लिमिटेड, ओमिनी ऍक्टिव्ह प्रा. लिमिटेड, श्रीनिवास मॅनरिसोर्स प्रा. लिमिटेड, सहारा सिक्युरिटी फोर्स, सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-आँप सोसायटी आणि अग्निहोत्री ग्रुप, वर्धा तसेच जय महाकाली शिक्षण संस्थेचा देखील समावेश होता.
सदर भव्य अशा रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ९९९ बेरोजगार युवक आणि युवतींनी आपली नोंदणी करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मुलाखत दिली. यातील १ हजार ६१४ जणांची निवड करण्यात आली असून त्यांना यावेळी नियुक्ती पत्र देखील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आज मंगळवारी वर्ध्यातील रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी गायकवाड, तहसीलदार रमेश कोळपे, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, अग्निहोत्री ग्रुपचे सचिव सचिन अग्निहोत्री, मुख्याधिकारी राजेश भगत, सेवानिवृत्त तहसीलदार बी एन तिनघसे, आयटीआयचे निदेशक विलास भगत, प्रा. बोबडे, गुरुदेव सेवा मंडळाचे दिलीप अतकरे, सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश मोगरे, भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक पवन तिजारे, सिंदी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती दिलीप गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक तथा कोटंबा येथील सरपंच रेणुका कोटंबकार, पुणे येथील श्रीनिवास जॉब सेंटरचे सिईओ गोविंद वाघमारे व परशुराम कुसाळकर आदि मान्यवर यावेळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रेणुका कोटंबकार यांनी तर संचालन किरण पट्टेवार यांनी केले.
सदर रोजगार मेळाव्याच्या यशस्वितेसाठी साहसिक जनशक्ती युवा संघटना, साहसिक जनशक्ती संघटना तसेच पदाधिकारी सह अनेकांनी परिश्रम घेतले.