शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह नुकसान भरपाईसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांना निवेदन
सचिन धानकुटे
सेलू : – अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसह नुकसानग्रस्त शेताचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, याकरिता आज काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या आठवडाभरा पासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नदी-नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात शेतातील पिके अक्षरशः मुळासकट खरडून गेली. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, यासोबतच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली.
याप्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते तहसील कार्यालयाच्या समोरील रस्त्याच्या संदर्भात देखील चांगलेच आक्रमक झाले होते. या कामाच्या कंत्राटदाराने बोगस कागदपत्रांच्या आधारे कमिशनच्या जोरावर कंत्राट प्राप्त केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंता यांना जाब विचारण्याची भुमिका यावेळी घेण्यात आली. तीन कोटी रुपयांचे बसस्थानक अवघ्या तीन महिन्यांत गळायला लागल्याने आमदारांच्या “त्या” कार्यप्रणालीवर देखील यावेळी ताशेरे ओढण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव शेखर शेंडे, सेलू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मिश्रा, कार्याध्यक्ष काशिनाथ लोणकर, काँग्रेसच्या आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष पंढरी जुगनाके, किसान काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र वैरागडे, उपाध्यक्ष नितीन दिघडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौरभ शेळके, शेखर झाडे, सलमान पठाण, प्रशांत मुडे, महेंद्र डोळे, प्रफुल्ल करडे, विनोद लिडबे, सतीश भावरकर, रवींद्र आदमने, मनिष देवतारे, मंगेश काळे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.