भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या तलाठी..! शेतकऱ्यांकडून कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचे कौतुक
सचिन धानकुटे
सेलू : – अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात शेतातील उभी पिकं खरडून गेलीत. गेल्या सहा दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस सातत्याने पडतोय. त्यामुळे अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून नदी व नाल्यांच्या काठावरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सदर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज चक्क महिला तलाठी भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील अशा कर्तव्यदक्ष महिला तलाठ्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
सेलू तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. या सहा दिवसांत चारवेळा नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. या पूराच्या पाण्यात काठावरील शेतपिकांचे खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतात तर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती कायम आहे. सदर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज बुधवारी सेलू साझाच्या तलाठी बत्रा मॅडम भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या. यावेळी त्यांच्या समवेत कृषी सहाय्यक रंगारी, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य राजेश झाडे, पोलीस पाटील संजय रघाटाटे, शेतकरी नारायण भुते, शेखर झाडे उपस्थित होते. यावेळी रेहकी परिसरातील मौजा नवाबपूर, लेहकी(खुर्द) भागातील नुकसानीचा आढावा घेण्यात आला. भरपावसात एक महिला तलाठी अचानक शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याने त्यांनी देखील “त्या” कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचे कौतुक करीत सहकार्य केले.