महावितरणचा दुर्लक्षितपणा..! उघड्या रोहित्रामुळे अपघाताची शक्यता
सचिन धानकुटे
सेलू : – शहरातील दोन प्रभागाच्या मध्यावर असलेल्या महावितरणच्या एका उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणचा हा दुर्लक्षितपणा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे महावितरणने तत्काळ “त्या” धोकादायक रोहित्रास योग्य उंचीवर बसवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक आठ व सोळा या दोन्ही प्रभागाच्या मध्यावर महावितरणचा एक विजेचा खांब आहे. त्या परिसरातील सार्वजनिक विजपुरवठा सुरू किंवा बंद करण्यासाठी त्या खांबाच्या सुरुवातीला एक रोहित्र बसविण्यात आले. त्या रोहित्राला दरवाजा तर सोडा लहान बालकांचा विजेच्या तारांना थेट संपर्क होईल, अशा पद्धतीने विजतारा उघड्या पडल्या आहेत. त्या रोहित्राची उंची ही जमिनीपासून लहान मुलांचाही स्पर्श होईल अशाप्रकारे ठेवण्यात आली. सध्या पावसाळा सुरू असून एखाद्या मुलाचा त्या रोहित्राच्या भागास चुकून स्पर्श झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धोकादायक ठरणाऱ्या त्या रोहित्रास महावितरणने योग्य उंचीवर बसवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.