समीर देशमुखांना वर्धा लोकसभा उमेदवारी लढवण्यासाठी लोकवर्गणी करणार : कार्यकर्त्यांचा सुर
वर्धा : महाराष्ट्रातील राजकीय पटलावर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार म्हणून सध्या समीर देशमुखांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून उमेदवारी द्यावी, असा आग्रह वर्धा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या वर्धा येथील जाहीर बैठकीत समीर देशमुखांना उमेदवारी दिल्यास आम्ही स्वखर्चाने मतदारसंघ पिंजून काढू आणि त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
अशी माहिती आहे की, या बैठकीत काही लोकांनी समीर देशमुख यांना लोकवर्गणी म्हणून काही मदत जाहीर केली. यात माजी नगरसेवक मुन्ना झाडे, गणेश कामनापुरे, अशोक वाघमारे, केसरीचंद खंगारे, मिलींद हिवलेकर आणि अजून काही लोकांचा समावेश आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात स्वच्छ प्रतिमेचा युवा चेहरा म्हणून समीर देशमुखांना उमेदवारी करण्यासाठी लोकवर्गणी करून निवडून आणू, अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केली.
“धनशक्ती विरुद्ध जनशक्ती” अशी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. समीर देशमुखांना जो संस्कारसंपन्न सार्वजनिक जीवनात वारसा आहे. तो वारसा आता वर्धा लोकसभा मतदारसंघात पुन्हा नव्या ताकदीने उभा करून लोकसेवा करण्यासाठी संसदेत समीर देशमुखांना पाठवावे, असा जोरदार आग्रह जनतेतून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून जर समीर देशमुखांना उमेदवारी दिली तर वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जागा हुकमी निवडूण आणण्याचा संकल्प उपस्थित कार्यकर्त्यांनी केला आहे.