खडकाळ जमिनीवर “भाऊंच्या” हिरव्या सृष्टीचा साक्षात्कार ; विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खान्देशातील जळगांवचा शेती संशोधन प्रकल्प प्रेरणादायी
सचिन धानकुटे
वर्धा : – पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी केवळ उदरनिर्वाहचं करु शकतात, परंतु त्याचं शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघितल्यास खडकाळ जमिनीचा देखील रानमळा झाल्याशिवाय राहत नाही, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जळगांव येथील जैन इरिगेशनचा शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्राचा प्रकल्प होय. विज्ञानाला जर तंत्रज्ञानाची सांगड घातली तर खडकाळ जमिनीत देखील हिरव्यागार सृष्टीचा अविष्कार होवू शकतो. जळगांव येथील जैन हिल्सचा सदर प्रकल्प हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खरचं प्रेरणादायी असा आहे.
मुख्यतः खान्देशातील जळगांवची ओळख केळीचे आगार अशी आहे, परंतु जैन हिल्सच्या येथील जवळपास दोन हजार एकरमध्ये वसलेल्या शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्राच्या प्रकल्पाने जळगांवला एक नवी आणि वेगळी ओळख निर्माण करून दिली. येथे मौजा घाट परिसरात निर्माण करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध अशा “भाऊंच्या सृष्टी”त विविध प्रकारच्या प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली. तीन हजार आठशे फूट उंचीवर वसलेल्या या सृष्टीला “नक्षत्र वन” म्हणून ओळखले जाते. “भाऊंच्या सृष्टी”त सप्तर्षी तसेच नवग्रह वनाची देखील संकल्पना राबविण्यात आली. येथील प्रत्येक झाडं आपल्या वेगळ्या वैशिष्ट्य आणि महत्त्वासाठी ओळखले जाते. झाडांच्या आपल्या महत्त्वानुसार त्यांची येथे योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने लागवड करण्यात आली. प्रतिक भोसले यांनी २८ हजार पाईप्सच्या तुकड्यांपासून साकारलेले भाऊंचे मोजँक आर्ट लक्षवेधक असेचं आहे. जळगांवात शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्राची मुहूर्तमेढ रोवणारे भाऊ म्हणजे संस्थापक “भंवरलाल जैन”. त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांसाठी आदर्शचं आहे.
येथील केळीच्या रोपांचा टिश्यू कल्चरल प्लान्ट हा देखील विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी जगप्रसिद्ध आहे. येथे दिवसभरात एक लाख केळीची संशोधित रोपं तयार केली जात असून तीन कोटी रोपांची साठवण क्षमता उपलब्ध आहे. सदर प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला सुद्धा नोंद घेण्यात आली. दोनशे एकराच्या विस्तीर्ण अशा जागेत जैन पाईप्सचा भव्य प्लान्ट उभारण्यात आलाय. व्हर्टिकल फार्मिंगची देखील यशस्वी अशी संकल्पना येथे राबविण्यात आली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना एका एकरात चक्क पन्नास एकराचे उत्पन्न घेता येवू शकते.
येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनचे “गांधी तिर्थ” उत्कृष्ट वास्तूकला आणि आपल्या वेगळ्या संकल्पनेसाठी ओळखले जाते. येथील हाईटेक प्लान्ट फॅक्टरी देखील अप्रतिम आहे. ज्यात टिश्यूकल्चर रोपे, कलम रोपे, बियाण्यांपासून निर्मित रोपे आणि बियाणे व कंद वर्गीय बियाणे अशा चार विभागांचा समावेश आहे.
१४ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत येथे कृषी महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना “हायटेक शेतीचा नवा हुंकार” अनुभवायला मिळत आहे. जैन इरिगेशनचा हा उपक्रम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी आहे.